नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्या काँग्रेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यातील अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांनी शनिवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. उदयपूरमध्ये झालेल्या ‘एक नेता, एक पद’ ठरावाचे पालन करत खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. खरगे यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पी.चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांच्या नावांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरसीची लढत होणार आहे. सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे, तसेच ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही खरगे यांच्या नावाला पसंती दिली असल्याने तेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितले होते. मात्र, सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले.
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर शुक्रवारी वाजतगाजत पक्षाच्या मुख्यालयात आले; पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. बंडखोर नेते ‘तटस्थ’ राहिलेल्या सोनिया गांधींचे उमेदवार खरगे यांच्या शेजारी उभे होते.