मुंबई – नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
देशातल्या संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने काम करतायत, हे यानिमित्ताने दिसून आले. विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधिमंडळ सदस्यांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळे लावा, अशी तीव्र प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक काय गुन्हेगार आहेत का, त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झालाय का, त्यांना शिक्षा ठोठावली आहे का, असे एकामागोमाग एक सवाल करत त्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याचे राऊत म्हणाले. देशातल्या सर्व यंत्रणा कशा दबावाखाली काम करत आहेत हे या निमित्ताने पुन्हा दिसून आले, असे ते म्हणाले.