मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट-2006 प्रकरणी सहा वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या हिंदूगटातील चौघा जणांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी धन सिंग, लोकेश शर्मा, मनोहर सिंग नरवारिया आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केला. जामीनावर सुटल्यानंतर तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याबरोबरच खटल्याशी संबंधित कुठल्याही पुराव्याशी छेडछाड अथवा कुठल्याही साक्षीदाराशी संपर्क साधू नये. तसेच खटल्याच्या सुनावणी दरम्यान नियमित हजर राहण्याच्या अटींवरती हा जामीन मंजूर केला.
मालेगावमध्ये 8 सप्टेंबर, 2006 रोजी बडी रातच्या दिवशी मशिदीजवळ कब्रस्तानाबाहेर साखळी बॉम्ब स्फोट झाला. सायकल बॉम्बद्वारे घडविण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटात 31 जणांचा मृत्यू, तर जवळपास 312 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणी सुरूवातीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सिमी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या नऊ मुस्लिम तरूणांना अटक केली. मात्र त्यांनतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग झाल्यानंतर स्वामी असिमानंदन या अभिनव भारत या संघटनेच्या सदस्याला अटक करण्यात आली.
हा बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याची कबुल त्याने दिल्याने एनआयएने अन्य धन सिंग, लोकेश शर्मा, मनोहर सिंग नरवारिया आणि राजेंद्र चौधरी या चौघांना 2013 मध्ये अटक केली होती. दरम्यान गेली सहा वर्षें कारागृहात असलेल्या या चौघा आरोपींचा मुंबई सत्र न्यायालयाने 6 जून 2016 मध्ये जामीन अर्ज फेटाळला. त्या विरोधात उच्च न्यायालयात या चौघा जणांनी अपील दाखल केले होते.