मुंबई – शहरातील मालाड मालवणी भागात रहिवासी चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘या दुर्घटनेला कोण जबाबदार?’ असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली असून याेवळी खासदार गोपाळ शेट्टी होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, ”मालवणी (मालाड) येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली, यावेळी योगायोगाने महापौर किशोरी ताई पेडणेकर देखील उपस्थित होत्या. ह्या भागात चार-चार माळ्याच्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहत आहेत, यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशा आशयाच पत्र देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास यावेळी आणून दिली. ‘या दुर्घटनेला कोण जबाबदार?’ यावर तर्कवितर्क लावत बसण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई व्हावी,अशी आमची मागणी आहे. याविषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे”
ही जागा जिल्ह्याधिकारी अखत्यारीतील असून येथे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर असून या अनधिकृत बांधकामाविषयी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचंे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. अधिवेशनात या विषयी आवाज उठवणार असल्याचेही दरेकरांनी सांगितले आहे.
पालिका अधिकारी आणि इतर लोकांमध्ये साटंलोटं आहे. आर्थिक व्यवहार असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांना अभय मिळत असल्याची टीका दरेकरांनी केली आहे.