नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त विनियोग करावा, अशी सूचना पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना केली आहे. अर्थसंकल्पातील खर्चाचा दर तीन महिन्यांनतर आढावा घेण्यात यावा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध विषयांशी संबंधित सविस्तर सादरीकरण पंतप्रधानांना सादर केले. किमान सरकार आणि कमाल प्रशासन अशी सूचनाही यावेळी पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांना केली असल्याचे समजते आहे.
प्रत्येक मंत्रालयात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जास्तीत जास्त क्षमतांचा वापर करण्यात यावा, यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला आहे. स्वनिधी योजनेसारख्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल, असे पहावे, असेही पंतप्रधानांनी मंत्र्यांना सांगितले आहे. कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्यात यावेत. सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी नियमित बैठका घेण्यात याव्यात, अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. काल चाललेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक तब्बल 4 तास सुरू राहिली होती.