गडचिरोली : जनतेने केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी जनतेकडून झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. यानंतरही जनतेने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरित्या करुन आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, आरोग्य विभागाला निधीची कमतरता येऊ देणार नाही. आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावे. आम्ही प्रस्तावास तातडीने मंजूरी देऊन ते प्रश्न मार्गी लावू. व्हेंटीलेटर, लॅब उभारणी याकरिता आवश्यक मंजूरी तसेच निधी हा आपल्याला तातडीने देण्यात येईल. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, उप जिल्हाधिकारी कल्पना निळ – ठुबे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १८८४४ मजूर गेल्या आठवड्यात बाहेरुन आलेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यामधून ४००९ व बाहेर राज्यातून १४८३५ लोक गडचिरोली जिल्ह्यात आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात फिलिपाईन्स या देशामधून एक स्थानिक व्यक्ती आलेला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नसली तरी क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून आज रोजीपर्यंत २४६८ लोक बाहेर गेले आहेत. ४२१९९ लोकांना आतापर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. आज पर्यंत यातील १९१३१ लोकांचे होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. प्रशासन योग्य ते निर्णय घेत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य विभाग हे जबाबदारीने कार्य करत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जे क्वॉरंटाईन केलेले लोक आहेत त्यातील काही लोक घरी जाण्यासाठी आग्रह करत असून काही लोक प्रतिनिधीसुद्धा घरी जाण्यासाठी आग्रह करत आहेत. त्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी प्रशासनाला दबाव टाकून घरी जाण्यासाठी आग्रह करु नये. गडचिरोली जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. आपल्या सहकार्याची अपेक्षा असून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याला कायम कोरोना मुक्त ठेऊ अशी शपथ घेऊन सहकार्य करावे.
जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. परंतू याविषयीही तक्रारी प्राप्त होत असून व्यापारी वर्गांनी दुकानामध्ये गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सुरक्षित अंतर ठेवून सामानाची खरेदी विक्री करण्यात यावी, याची दक्षता व्यापारी वर्गांनी घ्यावी.
जमीन मोजणीची कामे सुरू….
जमीन मोजणीची कामे बंद होती. त्यामुळे लोकांना अडचणी निर्माण होत होत्या. आता ग्रीन तसेच ऑरेंज झोन मध्ये जमीन मोजणी बंदी शासनाकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे शासनाला मोठा महसूलही मिळेल व लोकांची कामेही पूर्ण होण्यास मदत मिळेल, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.