पुणे – बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरू असलेली पाण्याची टंचाई आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा यांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
सिंचन भवन येथे खासदार सुळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांची भेट घेतली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील नाझरे प्रकल्पावर सध्या 50 गावे, जेजुरी एमआयडीसी तसेच धरणातील उपसा जलसिंचन योजनेच्या सुमारे एक हजार विद्युत मोटारी आहेत. परिणामी लाभक्षेत्राच्या शेतीला पाणी मिळत नाही. म्हणून पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी इतर शेतकऱ्यांच्या दराने या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली.
याशिवाय जनाई योजनेचे पाणी दौंड तालुक्यातील काही गावांना, शिरसाई योजनेतून काही पाणी आसपासच्या काही गावांतील छोट्या छोट्या तलावांत सोडणे आवश्यक असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.
मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी शिवेवरील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असे यावेळी सुळे यांनी सांगितले. याशिवाय मतदार संघातील अनेक गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कामे मंजूर झाली असून निधीही मिळाला आहे. ती कामे पूर्ण होऊन त्या-त्या गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कालव्याची पाइपलाइन ठरेल फायद्याची
नीरा देवघर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद पाइपलाइनमधून नेण्याबाबत अद्याप सर्व्हे झालेला नाही. या प्रकल्पाचे तातडीने सर्व्हेक्षण होऊन त्यानुसार कार्यवाही झाल्यास पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट नसलेल्या म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, करंजगाव, गोळेवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, वाठारहिमा, पिसावरे, महुडे बुद्रुक, भानुसदरा, महुडे खुर्द, माळवाडी, ब्राह्मणघर हिमा या गावांचा समावेश व्हावा. या गावांच्या वरच्या डोंगराकडील बाजूने कालव्याची पाइपलाइन गेल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असेही सुळे यांनी सांगितले.