मुंबई – केंद्र सरकारने बेळगाव केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तेथील सीमा भागात कन्नड भाषिकांकडून मराठी भाषिकांवरील हल्ले सुरूच आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. त्यांनी बेळगावांतील दुकानांचे मराठी फलक काढून टाकले असून मराठी भाषिकांच्या विरोधात सोशल मिडीयांमधून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत असेही शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मुखपत्रात म्हटले आहे.
हा अत्याचार इतका वाढला आहे की कन्नड पोलिसही मराठी भाषिकांवर अत्याचार करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. हे अत्याचार थांबले नाहींत तर केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय केंद्र व कर्नाटक सरकारकडे उपस्थित केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. इंदोर, बडोदा येथेही मराठी भाषिक मोठया प्रमाणात वास्तव्याला आहेत पण त्यांच्या बाबतीत अशी स्थिती कधी उद्भवत नाही.
महाराष्ट्रातही असंख्य विविध भाषिक नागरीक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात आहेत. त्यांना येथे कधीही अशी हीन वागणूक दिली गेलेली नाही असेही शिवसेनेने निदर्शनाला आणून दिले आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अत्याच्याराचा विषय कर्नाटकातील भाजप सरकार ज्या पद्धतीने हाताळते आहे, ते पहाता ते मराठी भाषिकांवर हल्ले करणाऱ्यांना पाठीशीच घालत असल्याचे दिसते आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
सीमा वादाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असताना सीमा भागातील मराठी बांधवांना अशा प्रकारची वागणूक देणे बेकायदेशीर आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.