नवी दिल्ली – अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तीन कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. एखाद्या कर्णधाराचे अवलोकन करण्यासाठी हे पुरेसे आहे. या कसोटी मालिकेत त्याने केलेले गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची केलेली योग्य आखणी यावरुनच त्याचे कुशल नेतृत्व दिसून येते. रहाणेच्या चुका शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, मात्र त्याने आखलेल्या सर्व योजना यशस्वी ठरल्या. त्यामुळे निदान कसोटी सामन्यांसाठी तरी रहाणेकडेच नेतृत्व दिले गेले पाहिजे, असे मत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी मांडले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) अत्यंत हुशारीने सांभाळले आहे. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपदी त्याच्याकडेच सोपवले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, बीसीसीआयने हे वृत्त नाकारले असून कोहलीच्या कर्णधारपदाला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.