पुणे – सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून समुद्रापेक्षा जमिनीचे तापमान अधिक वाढत आहे. गेल्या शतकात जमिनीच्या तापमानात दीड सेल्सियसने वाढ झाली असल्याचे जागतिक हवामान बदल संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या तापमान वाढीमुळे जमिनीची गुणवत्ता खालावत असून यामध्ये शेतीचा मोठा वाटा असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
जागतिक हवामान बदल संघटनेच्या आयपीसीसीतर्फे हवामान बदल आणि जमिनीच्या गुणवत्तेवर होणारे परिणाम यासंदर्भात अहवाल प्रकाशित करण्यात आला. यानुसार गेल्या शतकापासून जमिनीचे तापमान सातत्याने वाढत आहे. ही एक चिंतेची बाब असून, जमिनीची गुणवत्ता खालावत चालली आहे. याचे प्रमुख कारण शेती असल्याचेही यात नमूद केले.
कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “हवामान बदलाचे प्रमुख कारण औद्योगिक प्रदूषण आणि वाहनांची वर्दळ हे आहे. शेतीमुळे नक्कीच परिणाम होतो. परंतु या दोन घटकांच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. या दोन्हींची तुलना केली असता, शेतीमुळे 15 टक्के तर इतर घटकांमुळे 85 टक्के परिणाम होतो. जनवारांच्या शेणातून, रासायनिक खतांच्या वापरामुळे मिथेन वायूची निर्मिती होते, हे वास्तव असले तरी सेंद्रीय शेतीमुळे हा प्रकार रोखण्यास मोठी मदत होऊ शकते.’