शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी जमिनीच्या वादातून हाणामारी व गंभीर गुन्हे होत असताना केंदूर येथे जमिनीच्या वादातून वीस जणांच्या टोळक्याने पाच जणांवर कोयता, काठ्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले असून चार वाहनांची तोडफोड देखील हल्लेखोरांनी केली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
केंदूर( ता. शिरूर) येथील पऱ्हाडमळा येथे शांताराम पऱ्हाड यांच्या आजोबांच्या नावावरील जमिनीमध्ये त्यांचे चुलत भाऊ भिका पऱ्हाड, कांताराम पऱ्हाड यांनी आनेवारीमध्ये स्वतःचे नाव लावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून शांताराम यांच्या जमिनीमध्ये ताबा घेण्याचा सदर लोक प्रयत्न करत आहेत.
शनिवारी रात्री शांताराम हे कुटुंबियांसमवेत घरामध्ये बसलेले असताना अचानक बन्सी पऱ्हाड व अन्य लोक हातामध्ये कोयता, लाकडी दांडके घेऊन आले यावेळी लगेचच एका पिकअप वाहनातून अनोळखी आठ ते दहा इसम हातामध्ये काठ्या घेऊन आले त्यांनी सर्वांनी मिळून शांताराम यांच्या घरातील व्यक्तींना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरवात केली यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये बन्सी पऱ्हाड याने घरातील फक्कड पऱ्हाड याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यामध्ये कोयता मारून जखमी केले.
यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये फक्कड बाजीराव पऱ्हाड, यशोदा फक्कड पऱ्हाड, कैलास बाजीराव पऱ्हाड, संगीता कैलास पऱ्हाड, मनीषा प्रशांत पऱ्हाड, प्रवीण कैलास पऱ्हाड, शरद शांताराम पऱ्हाड, सरस्वती विलास पऱ्हाड, जनाबाई बाजीराव पऱ्हाड यांना मारहाण करण्यात आली असून यावेळी आलेल्या सर्व लोकांनी शांताराम पऱ्हाड यांच्या घरासमोर आलेल्या एका स्विफ्ट कार तसेच दोन दुचाक्यांचे नुकसान करत शांताराम यांच्या घरावर देखील दगडफेक करून घराचे नुकसान केले आहे.
यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये फक्कड बाजीराव पऱ्हाड, यशोदा फक्कड पऱ्हाड, संगीता कैलास पऱ्हाड, प्रवीण कैलास पऱ्हाड, सरस्वती विलास पऱ्हाड हे गंभीर जखमी झाले असून सर्वांवर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत शांताराम बाजीराव पऱ्हाड रा. पऱ्हाडमळा केंदूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बन्सी कांताराम पऱ्हाड, आबासाहेब भिमाजी पऱ्हाड, अमृता गुलाब पऱ्हाड, दौलतराव गुलाब पऱ्हाड, भीमा भिका पऱ्हाड, कांताराम भिका पऱ्हाड, अजित अमृत पऱ्हाड, राकेश दौलत पऱ्हाड, किरण दौलत पऱ्हाड, महेंद्र सुभाष तिकोणे, सर्व राहणार पऱ्हाडमळा केंदूर ता. शिरूर जि. पुणे, आकाश बाबासाहेब काळजे रा. चऱ्होली खुर्द ता. हवेली जि. पुणे तसेच अनोळखी आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल केले असून यापैकी किरण दौलत पऱ्हाड याला अटक केली आहे तर इतर सर्वजण फरार झाले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.
जमिनींचे वाद रोखणे गरजेचे ………………
शिरूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस जमिनींना भाव वाढत चाललेला असल्यामुळे जमिनीच्या वादांचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामध्ये अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, यामध्ये काहींना जीव देखील गमवावा लागू शकतो त्यामुळे जमिनींचे वाद रोखणे गरजेचे आहे.