मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एकूण ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यात मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याचादेखील समावेश आहे. दहशतवादी धारावीत राहत असूनही राज्यातील तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का? असा सवाल करत विरोधकांनी टीका केली असताना आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आले आहे. या संशयित दहशतवाद्याचे नाव झाकिर असल्याचे सांगितले जात आहे.
A joint team of Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch has taken a person into custody from Jogeshwari area of the city in connection with the terror module busted by Delhi Police earlier this week: Maharashtra ATS pic.twitter.com/ZYmIungyPl
— ANI (@ANI) September 18, 2021
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी झाकिरला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावत एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच प्रकरणात झाकिरला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री २ च्या सुमारास एटीएसचे वरीष्ठ अधिकारी देखील कार्यालयाबाहेर दिसून आले, तेव्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले. अखेर, रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. दरम्यान, यासंदर्भातली टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची देखील माहिती मिळत आहे.
दिल्ली पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. जान महंमद शेख ( ४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. १९९३ साखळी बॉम्ब स्फोटांप्रमाणेच पुन्हा स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा कट असल्याची बाब समोर आली आहे.