मुंबई – गणेश विसर्जनादरम्यान पाच मुले समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील वर्सोवा येथे घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोन मुले मिळाली असून अद्याप तिन जण बेपत्ता आहेत.
वर्सोवा गाव येथे मोठी दुर्घटना घडली असून येथे गणपती विसर्जन करताना पाच मुले समुद्रात बुडाली. यामधील दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र तीन मुले अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या मुलांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी दुर्घटनास्थळ आणि आसपासच्या समुद्रात शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे.