मुंबई – शनिवारपासून मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवीत हानी झाली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व भागातील डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून चार घरांचे नुकसान झाले आहे. शेजाऱ्यांनी तात्काळ घरातील चार नागरिकांना बाहेर काढले, काही नागरिक घरात अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठाण्याजवळील मासूंदा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.