पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यूपीएससी मुख्य परीक्षेच्या निकालात “सारथी’ संस्थेतील 52 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील असून, आता महत्त्वाचा टप्प्पा म्हणजे पुढच्या महिन्यात मुलाखती होत आहे. त्यासाठी सारथी संस्थेकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 233 उमेदवारांनी यूपीएससीची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये दिली. याचा निकाल 23 मार्च 2021 रोजी जाहीर झाला. त्यात “सारथी’ संस्थेचे 52 उमेदवार उत्तीर्ण झाल्याची माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
उत्तीर्ण उमेदवार हे पुणे, अहमदनगर, बुलढाणा, सातारा, सांगली, अमरावती, जळगाव, सोलापूर, नागपूर, नाशिक, परभणी, लातूर, रत्नागिरी, ठाणे, वाशीम, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, जालना, हिंगोली व धुळे जिल्ह्यांतील आहेत. यूपीएससीच्या मुलाखती एप्रिल व मे महिन्यात होतील. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
मुलाखत ही दिल्ली येथे असल्याने “सारथी’ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीचा सरावासाठी माजी सनदी अधिकारी व विषय तज्ज्ञांमार्फत घेतले जातील. विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन तज्ज्ञांद्वारे केले जाणार आहे. अधिकाधिक उमेदवार अंतिम निकालात यशस्वी होण्यासाठी “सारथी’ संस्थेद्वारे प्रयत्न करण्यात येत असल्याचे काकडे यांनी सांगितले.