मुंबई: महाराष्ट्राच्या मनातील महायुती आज मैदानात उतरली असे, देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली यामध्ये युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच यावेळी शिवसेना १२४, भाजप १५० आणि मित्रपक्ष २ जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. काही ठिकाणी पक्षाचे नेते आमने-सामने आहेत. त्यांना आम्ही समजावून सांगू, कुठेही बंडखोरी राहणार नाही. जर समजावल्यानंतर बंडखोरी झाली तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यानी दिला.
लोकसभेच्या वेळी महायुतीची घोषणा केली तेव्हाच माहित होत कि काही मतभेद असतील. पण हिंदुत्वाचा धागा शिवसेना व भाजपला जोडतो. एकत्र राहायचं असेल तर तडजोड करावी लागते आणि ती आम्ही सर्वांनी केली आहे. तसेच महायुती संपूर्ण महाराष्ट्रात निवडणून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आकड्यांवर काही अवलंबून नसत. तसेच लहान भाऊ मोठा भाऊ हे महत्वाचं नसून दोन भाऊ एकत्र राहणं महत्वाचं आहे. महाराष्ट्र जर चांगला घडवायचा असेल तर तुझं-माझं करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विचार करावा.
तावडे आणि आणि खडसेंना भाजपने यावेळेस डावलले आहे. याबाबत नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, भूमिका सतत बदलत असतात. काही विधानसभेत काम करतील. तर काही विधानसभेबाहेर काम करतील. ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो त्यांना आम्ही सोबत घेतले आहे.