Maharashtra Politics : राज्यातील महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा खतपाणी मिळालं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. विशेषतः जळगाव विधान परिषद जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics) शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. इतकंच नाही तर, “जर महायुतीतून ही जागा शिवसेनेला मिळत नसेल, तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Politics) दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानाने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. “आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहेत,” असं मोठं विधान त्यांनी केलं. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून एकत्र लढवल्या जाणार की स्वतंत्रपणे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Maharashtra Politics) मस्के यांनी सांगितलं की, शिवसेनेच्या ‘शिवसंवाद दौऱ्या’चा उद्देश कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटन अधिक मजबूत करणं हा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा दौरा आयोजित करण्यात आला असून शहापूर आणि मुरबाड मतदारसंघांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. (Maharashtra Politics) यावेळी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही मस्के यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे साहेब स्वतःच टायगर आहेत. त्यामुळे त्यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही,” असं म्हणत त्यांनी चर्चांना वेगळं वळण दिलं. सध्या महायुतीतील तणाव हा जागावाटपापुरता मर्यादित आहे की त्यामागे मोठं राजकीय समीकरण दडलं आहे, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Politics)