अकोले – चहुबाजूने होणाऱ्या हल्ल्याला तोंड देणारे महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे सध्या डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने युद्धपातळीवर पावले टाकत आहेत. पडद्याआडून त्यांचे पिता व माजीमंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे सर्व सहकारी युद्धपातळीवर यादृष्टीने पावले टाकत आहेत.
महायुतीच्या युती धर्माला न जागणारे उपसभापती मारुती मेंगाळ यांचा पहिल्या टप्प्यात बंदोबस्त करणारी पावले पिचड यांनी टाकली आहेत.त्यांनी पंचायत समितीच्या बारा गुणांपैकी अकरा गणातील पंचायत समिती सदस्य हे एकत्र केले आहेत. आणि त्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सदस्य त्यात समाविष्ट आहेत. या सदस्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आणि युतीधर्म पाळण्याचे यावेळेस धोरण जाहीर केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी 3 जिल्हा परिषद सदस्य पिचड पिता-पुत्रांनी एकत्र आणून आपली मताधिक्य परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. त्यामध्ये कैलासराव वाकचौरे, रमेश देशमुख त्याचबरोबर जालिंदर वाकचौरे या सदस्यांना ही त्यांनी एका झेंड्याखाली आणण्याच्या दृष्टीने कारवाई केली आहे.
पक्षीय पातळीवर सर्व कार्यकर्ते श्रीगोंदा पॅटर्नचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने नाही व्यूव्हरचना आखीत आहेत. त्याचबरोबर या सर्व प्रचार मोहिमेत सभांऐवजी त्यांनी व्यक्तिगत गाठीभेटीवर भर दिला आहे. गटागटाने असणारी कार्यकर्त्यांची विभागणी करून त्यांनी या महायुतीच्या गडाला कशी बळकट मजबुती आणता येईल? या दृष्टीने युद्धपातळीवर आपली भूमिका बजावण्याचे काम सुरू ठेवले आहे.
वरिष्ठांशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, सेक्रेटरी भाऊसाहेब वाकचौरे हे आपल्या पक्षाच्या बरोबरच इतर शिवसेना शेतकरी संघटना आरपीआय आणि इतर घटकांशी संपर्क साधून आपली बाजू बळकट करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्नशील आहेत. एकूणच या महायुतीच्या पातळीवर लगीनघाई सुरू आहे आणि प्रचाराच्या बरोबरच डॅमेज कंट्रोलचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.