पुणे – जिल्ह्यातील प्रत्येकाला पक्के घर मिळण्यासाठी महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांना सहभागी करून शंभर दिवस हे अभियान राबविले जाणार आहे.
हे अभियान दि. 20 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते दि. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहेत. शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना व राज्याच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी गवंडी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
घरकुलाबरोबरच इतर शासकीय योजनांचा घरकुल लाभधारकांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे.