पुणे – थकबाकीचा टक्का कमी करण्यासाठी महावितरण प्रशासनाने राज्यभरात पुन्हा वसुली मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व परिमंडलांना टार्गेट ठरवून दिले आहे. तसेच, यासाठी खास पथकांची स्थापना केली असून त्यांना संबंधित वीज ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्याचे अधिकार दिले आहेत.
वीज थकबाकीदार ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्यभर वसुली मोहिम राबविली होती. त्यामध्ये प्रशासनाला अपेक्षित यश आले आहे. त्यामुळे थकबाकीचा टक्का कमी झाला असतानाच आणि कारवाई थंडावली असतानाच थकबाकीदारांनी पुन्हा थकबाकी वाढविण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे हा थकबाकीचा टक्का वाढत आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत पुन्हा थकबाकीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.
ट्रान्सफार्मरची देखभाल, दुरुस्तीच्या सूचना
ट्रान्सफार्मरला आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्याशिवाय प्रशासनाचेही आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या काळात तर वारंवार हे प्रकार घडत आहेत. या प्रकाराची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या ट्रान्सफार्मरची देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.