पुणे – राज्यातील महविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही, ते त्यांच्या कर्माने केव्हाही पडेल असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी गुरूवारी व्यक्त केले.
रवी यांच्या उपस्थितीत संघटनमंत्री, शहर भाजप पदाधिकारी आणि दाक्षिणात्य आघाडीच्या बैठका झाल्या. या बैठकीला खासदार प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे आदी आमदार आदी उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षांत महविकास आघाडी सरकारची ओळख वसुली सरकार अशी झाली आहे. हे सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. घेतलेले निर्णय त्यांना किंवा न्यायलयाला बदलावे लागत आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारधारा असणाऱ्या तीन पक्षांनी अनैसर्गिक आघाडी सत्ता स्थापन केली आहे. परंतु त्यांच्यात एकवाक्यता नाही. राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे. अंतर्विरोधातून हे सरकार केव्हाही पडेल, असे रवी म्हणाले.