मुंबई – राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल का? याबाबत विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले कि, सरकार टिकण्यासाठी नेतृत्व करणारी व्यक्ती कशी आहे. तिचा स्वभाव कसा? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि सध्या ज्या व्यक्तीकडे नेतृत्व आहे त्यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेत ज्यांना जे काम दिलं आहे ते त्यांनी करावं, त्यात हस्तक्षेप करायचा नाही, असा आहे. हे सरकार संमिश्र आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यानुसार काम सुरु असल्याने कटुता, नाराजी नाही. मी ८८ च्या दशकात किती पक्षाचं सरकार चालवलं हे सगळ्यांना माहित आहे, अशा शब्दात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत सांगितले आहे.
काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात. बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले.