एमआयटी, कोथरूड येथे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे थाटात वितरण
पुणे – “जगात भारताची ओळख महात्मा गांधी यांच्यामुळे आहे. गांधीजींचे विचार आजही जगाला शांतीचा मार्ग दाखवत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विचारांचे अनुकरण भारत करत आहे, त्यामुळेच गांधी म्हणजेच भारत आहे, असे विचार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी संचालक व “मिरी’चे महासंचालक डॉ. प्रीतम सिंह यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार एमआयटी, कोथरूड येथे पार पडला. त्यावेळी “भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांना “भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरवण्यात आले. यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जागतिक अरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. आर.एम. चिटणीस व प्रा. दीपक आपटे हे उपस्थित होते.
डॉ. कांग यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतातील दोन महान व्यक्तींचा येथे सन्मान होत आहे. ही संस्था जगात शांतीसाठी कार्य करीत आहे. माझ्या जीवनाला मार्गदर्शन दाखवण्याचे कार्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी झाले. स्वामी विवेकानंद यांनी सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवला. त्यांनी सांगितले होते, की या देशाचा युवक भविष्य बदलेल. तसेच 21व्या शतकात भारतमाता हे ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.