दिलीप वळसे पाटील : खासदार अमोल कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नारायणगाव – राज्यात सरकार स्थापनेबाबत हायकमांड निर्णय घेणार आहेत. त्याप्रमाणे महा”शिव’आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचे विधान विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नारायणगाव येथे केले.
शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार कोल्हे यांच्या मातोश्री रंजनाताई रामसिंग कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, देवदत्त निकम, पांडुरंग पवार, प्रदीप वळसे पाटील, बाबुराव बांगर, बापू भेगडे, तानाजी बेनके, दादाभाऊ बगाड, शरद लेंडे, मानसिंग पाचुंदकर, विष्णू हिंगे, ऍड. गफूर पठाण, प्रकाश पवार, सचिन भोर, नगरसेवक योगेश ससाणे, सूरज वाजगे, गुलाब नेहरकर, सचिन भोर, बाळासाहेब खिलारी, मकरंद पाटे, सागर कोल्हे, संभाजी लोहोटे, पंडीत गवळी, राजश्री बोरकर डॉ. अश्विनी कोल्हे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, उत्तर पुणे जिल्ह्यात तीन एमआयडीसींमध्ये स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्यपातळीवर शासनाच्या माध्यमातून आराखडा तयार केला जाईल, त्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी योगदान द्यावे. अमोल कोल्हे हे फक्त शिरूर मतदार संघातील नव्हे; तर महाराष्ट्राचे खासदार झालेले आहेत. आता नारायणगाव व पुणे येथे त्यांचे कार्यालय सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे लागणार आहे. येणाऱ्या पालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी घेऊन कोल्हे यांना पुन्हा फिरावे लागणार आहे.
आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी वाढली आहे. पाण्याचा प्रश्न किंवा केंद्रातील अथवा राज्य सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. पुढील काळात रस्ता रूंदीकरण, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प, विमानतळाचा प्रश्न, बैलगाडा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम राहणार आहे.
खासदार कोल्हे म्हणाले, शिरूर मतदार संघातील सहाही मतदार संघात नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे 22 दिवसांत चमत्कार होऊन आपण खासदार झालो. शरद पवार यांनी टाकलेला विश्वास आणि दिलीप वळसे पाटील यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा यांसह सर्व तालुक्यातील कार्यकर्ते, नेते यामुळेच हे यश मिळाले.
या यशात सर्व निवडून आलेल्या आमदारांचा मोठा वाटा आहे. नारायणगाव येथे कार्यालय सुरू झाले आहे. हडपसर येथील कार्यालय स्थलांतरीत करून पुणे येथे लवकरच नेण्यात येईल. पुढील काळात प्रत्येक गुरूवार व शुक्रवार मतदारसंघात राहणार, असे आश्वासन देवून नागरिकांच्या तक्रारीसाठी वेबसाईट उपलब्ध करण्यात आलेली आहे. लवकरच मोबाईल ऍप सुरू करण्यात येणार आहे. या ऍपद्वारे नागरीकांना आपल्या तक्रारी, अडीअडचणी मांडता येतील. राज्यात सत्ता स्थापन झाल्यास आमदार अतुल बेनके यांना राज्यमंत्री म्हणून घ्यावे, अशी मागणी यावेळी पांडुरंग पवार यांनी केली.
राज्यात सत्ता स्थापनेची गडबड सुरू आहे. लवकर राज्यातील सत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक जण पक्षांतर करीत होते, त्यावेळी व आत्ताही टेन्शन न घेणारा एकच माणूस म्हणजे शरद पवार. त्यांच्या विचारांशी प्रभावित होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे तरूण वर्ग वळाला आहे.
-दिलीप वळसे पाटील, आमदार आंबेगाव