कण्हेरी गावात शेळी आणि कुत्र्याचा पाडला फडशा ः ग्रामस्थ भयभीत
भवानीनगर / डोर्लेवाडी -कण्हेरी (ता. बारामती) भागात गुरुवारी (दि. 30) नर जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. मात्र त्या ठिकाणाहून मादी बिबट्याने पिंजऱ्याला गुंगारा देत पसार झाली. मात्र त्या ठिकाणाहून मादी पसार झाली. त्यामुळे मादी सध्या चवताळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे मादी आता शिकार करु लागली आहे. शनिवारी पहाटे कण्हेरी गावातील शेतकरी अमोल खरात यांची शेळी या बिबट्याने फस्त केली आहे तसेच राजेंद्र गजानन काळे यांचा कुत्र्याचा देखील बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे कण्हेरी, काटेवाडी परिसरात पुन्हा शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कण्हेरी, काटेवाडी भागांमध्ये असलेला बिबट्या वनविभागाने लावलेल्या जाळीमध्ये पकडला असला तरी अजूनही या भागामध्ये दुसरा मादी जातीचा बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही माहिती वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, रेस्क्यू टीमचे अभिजीत महाले, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे यांना ही माहिती समजताच या ठिकाणी जाऊन पाहणी केली. वनविभागाकडे असलेले दोन्ही पिंजरे कुलूप लावून बंद केले आहेत. मंगळवारी (दि. 4) हे पिंजरे पुन्हा उघडे केले जाणार आहेत. बिबट्याला पकडून नेला होता तोही पींजरा पुन्हा आणून या भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे बिबट्याची मादी पकडण्यासाठी वन विभाग पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.
नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
आतापर्यंत बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कण्हेरी गावातील मादी बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यासाठी बारामती वनविभाग आणि पुण्याची रेस्क्यू पथक प्रयत्न करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाच शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे आम्ही पंचनामे केले आहेत. त्यांना चार दिवसांत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
-त्र्यंबक जराड, वनपाल अधिकारी.