-अमित डोंगरे
महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची चर्चा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत होऊ लागली व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला प्रशस्तिपत्रक देत त्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. आता त्याला आकशही ठेंगणे वाटू लागले असेल. खरोखर महाराष्ट्राच्या मातीतील हा लढवय्या खेळाडू येत्या काळात स्टारपदाकडे पोहोचेल यात शंका वाटत नाही.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने केलेल्या अनेक खेळींचे कौतुक झाले. दस्तूरखुद्द महेंद्रसिंग धोनीने त्याच्या गुणवत्तेचे गुणगान केल्याने त्याच्याकडे पाहण्याचा टीकाकारांचा दृष्टिकोन बदलला. यंदा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले असले तरीही ऋतुराजने केलेल्या खेळी स्वप्नवत ठरल्या यात वाद नाही. कोणताही खेळाडू जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्या मागे प्रायोजकांची लाईन लागते हे आपण जाणतो. तीच रांग आता ऋतुराजसाठी लागल्याचेही स्पष्ट होत आहे. आज जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या ब्रॅण्ड्सने त्याच्याशी करार करण्याच झपाटा लावला आहे.
ऋतुराजच्या रूपाने चेन्नई संघाला स्टार खेळाडू मिळाला असून यंदाच्या कामगिरीच्या जोरावर त्याला स्पोर्टस मार्केटिंग व स्किल मॅनजमेंट कंपनी बेसलाईन व्हेंचर्सने त्याच्याशी करार केला आहे. आता त्याच्याकडे पैशांचा पाऊस नव्हे तर धबधबा सुरू होईल. ही कंपनी ऋतुराजचे व्यावसायिक हित जपणार आहे. 2019 सालच्या स्पर्धेच्या लिलावात त्याला चेन्नईने 20 लाख रुपयांत आपल्याकडे घेतले. मात्र, त्याने केलेली कामगिरी लाखमोलाची ठरल्याने त्याचा प्रवास सामान्य खेळाडू ते स्टार असा सुरू झाला असल्याची खात्री पटते. या पुणेकर खेळाडूने 2016 साली झारखंड विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राकडून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने अखेरच्या तीनही साखळी सामन्यात अर्धशतकी खेळी केली व आपली गुणवत्ताही सिद्ध केली. स्पर्धेतील अनकॅप खेळाडू असूनही त्याच्या कामगिरीची बरोबरी यंदा चेन्नईच्या संघातील कोणीही केली नाही हेच त्याच्या कामगिरीतील वैशिष्ट्ये आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत 51 या स्वप्नवत सरासरीने 204 धावा फटकावल्या आहेत. इतक्या धावा तर यंदा खुद्द धोनीलाही फटकावता आलेल्या नाहीत.
त्याचा ज्या कंपनीशी करार झाला आहे त्या कंपनीने पी. व्ही. सिंधू, स्मृती मानधना, दीपिका कुमारी, भुवनेश्वर कुमार, पंकज अडवाणी, सौरव घोषाल, संजू सॅमसन व अमित पंघाल असा स्टार्सशी करार केले आहेत. त्यामुळे या कंपनीने ऋतुराजचे महत्त्व जाणले असल्याचेच हे द्योतक आहे. यंदाच्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी त्याला करोनाची बाधा झाली होती, त्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग अनिश्चित समजला जात होता. मात्र, त्याने करोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत त्यातून यशस्वी होत स्पर्धेत सहभाग घेतला व आपल्या कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडले.
प्रथम दर्जाच्या 21 सामन्यांतून त्याने तेराशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यात त्याने 4 शतके व 6 अर्धशतके फटकावली आहेत. हजारे, देवधर व दुलीप करंडक स्पर्धांतून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धेतही त्याने आपली दखल घेणे भाग पाडले होते. तसेच भारताच्या अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरुद्ध 187 धावांची केलेली खेळीही कौतुकाचा विषय ठरली होती.
तो केवळ 23 वर्षांचा असून त्याच्यासमोर अत्यंत यशस्वी भविष्यकाळ आहे. कामगिरीबरोबरच तो विविध उत्पादन कंपन्यांच्या पसंतीचा खेळाडू ठरत आहे. त्याने असेच यश सातत्याने मिळवले तर तो येत्या काळात भारतीय संघातही दिसू शकेल व त्याचाही एक ब्रॅण्ड बनलेला पाहायला मिळेल असा विश्वास वाटतो.