अहमदाबाद – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दसऱ्याच्या प्ररूवसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निर्विवाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खो खो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.
संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशा संघावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र महिला खो खो संघाने 18-8 असा एक डाव व 10 गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने 3 मिनिटे संरक्षण करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका भोपी हिने 2.50 आणि 3.50 मिनिटे पळतीचा खेळ केला आणि 2 गुण देखील मिळवले. प्रियांका इंगळे हिने 1.50 मिनिटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने 8 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने 2.50 मिनिटे संरक्षण केले. रुपाली बडे हिने 3 मिनिटे पळतीचा खेळ करून सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतार हिने 1.40 मिनिटे संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने 1.20 मिनिटे नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.
पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनिटे राखून व 4 गुणांनी (30-26) विजय साकारत गोल्ड पटकावले.
महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने 2 मिनिटे व 1.10 मिनिटे संरक्षण केले. रामजी कश्यप याने 1.30 मिनिटे व 2 मिनिटे पळतीचा सुरेख खेळ केला. हृषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने 1.40 व 1.30 मिनिटे पळतीचा सुरेख खेळ केला व 6 गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाटा उचलला. सुरेश गरगटे याने 1.20 मिनिटे संरक्षण केले व 14 गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतीक वाईकर याने 1.20 मिनिटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने 4 गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.
तलवारबाजीत महाराष्ट्राचा पंचकार
महाराष्ट्राच्या तलवारबाजी खेळाडूंनी एकूण पाच पदके जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले. तलवारबाजी खेळात सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्रॉंझपदक जिंकले. सेबर सांघिक मुलांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (45- 43) अवघ्या तीन गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघाने 45-33 अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंनी दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली.
समर्थ रुचिताने घेतला पदकाचा वेध
युवा नेमबाज समर्थ मंडलिक आणि रुचिता विनेरकरने महाराष्ट्र संघाला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. या दोघांनी एअर पिस्तूल मिश्र गटात ब्रॉंझपदक आपल्या नावे केले. यासह राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या नावे नेमबाजीमध्ये तिसरे पदक नोंद झाले आहे. स्पर्धेत रुद्रांश पाटीलने नेमबाजी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्या पाठोपाठ अभिज्ञा पाटीलने ब्रॉंझपदकावर नाव कोरले. हीच लय कायम ठेव समर्थ आणि रुचिताने ब्रॉंझपदक जिंकले. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय नियमात स्वप्नील कुसाळे आपल्या गटात चौथ्या स्थानावर राहिला.
तलवारबाजीत उपांत्य फेरीत
तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुष संघाने अटीतटीच्या लढतीत जम्मू संघाचा 45-40 असा पराभव केला.