मुंबई – लॉक डाऊनच्या देशव्यापी चार टप्प्यानंतर देशभरामध्ये अनलॉक-१ द्वारे सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रामध्ये देखील मिशन बिगिन अगेनची घोषणा करत लॉक डाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यासाठी पावले उचलण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील मिशन बिगिन अगेननंतर मुंबई शेजारी वसलेल्या भिवंडी शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता आता भिवंडी शहर पुढील १५ दिवसांसाठी पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार आता भिवंडी शहर १८ जून ते ३ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. भिवंडी शहरामध्ये अत्यंत दाट लोकवस्ती असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण जात असून यामुळेच महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा क़डक लॉक डाऊन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला असून आयुक्तांनीही परवानगी दिलीये.
लॉक डाऊनच्या या १५ दिवसांमध्ये भिवंडी शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांसाठी प्रशासनातर्फे ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहे. भिवंडी शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत कोरोनाचे ६५० रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झालाय.