मुंबई / नवी दिल्ली / पणजी – महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या वादळी घडामोडींमध्ये २९ जून ही तारीख अत्यंत महत्वाची ठरणार आहे. एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार व शिवसेना पक्ष अडचणीत सापडला आहे. अशातच बुधवारी राज्याच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये शिवसेना औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडणार असून याबाबत ते आक्रमक असल्याचे समजते. शिवसेनेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या विपरीत असलेली ही भूमिका सेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पाडण्यासाठी तर घेतलेली नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
बहुमत चाचणीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
राज्याचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीची मागणी केली. राज्यपालांनी बुधवारी याबाबतचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहेत. राज्यपालांच्या या आदेशाला सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सध्या सुनावणी सुरु आहे.
बंडखोरांनी मुक्काम हलवला
विधान परिषद निवडणुकांच्या रात्री महाराष्ट्रातून सुरतला गेलेले सेनेचे बंडखोर आमदार गुहाटीला पोहोचले होते. तेथे तळ ठोकून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची भूमिका सातत्याने मांडली. या बंडखोर आमदारांनी बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला आसामातील मुक्काम हलवला असून ते आता गोव्यामध्ये दाखल होणार आहेत. बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी ते समर्थक आमदारांसह उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होतील असेही स्पष्ट केले होते.