पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विविध गटातील लढतींना आजपासून (शुक्रवार) तर मुख्य लढतींना शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पुण्यनगरीत आता वातावरण तयार होत असून राज्यातून विविध भागांतून कुस्तीपटू विजेतेपद मिळविण्याच्या इराद्याने शहरात दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड तर्फे ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून मंगळवारी होत असलेल्या समारोपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थित होणार आहे. यदांपासून स्पर्धेतील विविध वजनी गटातील विजेत्यांना सुवर्ण, रजत व ब्राँझपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या समपर्धेत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी अशा एकूण २० गटांमध्ये स्पर्धा घेतल्या जातील. वजनी गटांमध्ये ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट केसरी गट असे दहा वजनी गट आहेत.
तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झाले आहेत. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज केले जात आहेत.