“कॉलर की मिशी’ आज उत्तर मिळणार
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमालीचा वाढल्याने निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकत्याच मिळलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणूक आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील 2,13,875 यांना मते मिळून आघाडीवर आहे. तर उदयनराजे भोसले 1,82,099 मिळाली आहे. यातच पिछाडीवर असलेले उदयनराजे एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना भावुक झालेले पाहायला मिळाले.
उदयनराजे म्हणाले की,’“लोकशाहीत समाज हाच राजा असतो. त्यांनाच केंद्रबिंदू मानून मी आजवर वाटचाल केली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा असेल”, असं उदयनराजे म्हणाले. “मला चांगलं काय करायचं तेच करणार… मी चुकीचा निर्णय घेतला तर… मी जिंकून नाय येत तर पराभव होणार…मी २०-३०-२५ वर्षे घालवली, निस्वार्थपणे लोकांची सेवा केली. इथून पुढे गप्प बसणार”, असंही ते म्हणाले. याशिवाय “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील पाच वर्षे विकास थांबेल.”असं देखील उदयनराजेंनी म्हटलं.
या लाईव्ह अपडेटमुळे सध्या जिल्ह्यात “कॉलर की मिशी’ या प्रश्नाचे उत्तर अशी चर्चा सुरु असून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या पैजा लागल्या आहेत. तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने जोरदार ताकद लावली असली तरी उदयनराजे यांच्या अट्टाहासामुळे ही निवडणूक लादली गेल्याची भावना मतपेटीतून व्यक्त झाली असावी, अशी चर्चा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेने उदयनराजे यांना व समर्थकांना दिलासा मिळाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भरपावसात घेतलेल्या सभेने पुन्हा जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचा नूरच पालटून टाकला.
दरम्यान, श्रीनिवास पाटील यांची सनदी अधिकारी म्हणून गाजलेली कारकीर्द, दोन वेळची खासदारकी, सिक्कीमचे राज्यपाल या जमेच्या बाजू असून त्यांचा सातारा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यातच “वर घड्याळ’ आणि “खाली कमळ’ अशा पद्धतीने क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे.