मुंबई – “शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली.” अशा खरमरीत शब्दात सामनातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
“शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते व ते पूर्ण झाल्याचा आनंद गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते; पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. जळगावात ज्या व्यासपीठावर महाजन यांनी हे सत्यकथन केले त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. महाजन यांच्या वक्तव्यावर शिंदे यांनी टाळय़ा वाजवल्या व खुशीने दाढीवर हात फिरवला. शिंदे यांनी एक प्रकारे महाजन यांच्या विधानाचे समर्थन केले. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाले” असे महाजन म्हणाले असल्याचे सामनातून सांगत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
“महाजन यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राच्या जनतेस काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. ती महत्त्वाची आहेत. पहिले म्हणजे, शिवसेनेतून जे चाळीसेक लोक फुटले ते कोणत्याही उदात्त हेतूने फुटले नाहीत. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडले वगैरे सांगून जे आपल्या बेइमानीचे समर्थन करीत आहेत ती बकवास आहे. येथे हिंदुत्व वगैरे गोष्टीचा काहीच संबंध नाही. हे महाजन यांनीच स्पष्ट केले. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फुटली. शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. त्याची हवाच महाजन यांनी काढली. चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. त्यामुळे सत्तांतरामागच्या कारस्थानावरील पडदा उघडला आहे. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला. भाजपला महाराष्ट्र फोडायचा आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत व ते मिशन साध्य करायचे तर मग आधी शिवसेना फोडावी लागेल. शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र कमजोर करता येणार नाही याची खात्री असल्यानेच महाजन म्हणतात त्याप्रमाणे, शिवसेना फोडण्याचे ‘मिशन’ भाजपने पूर्ण केले” असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
“शिवसेना फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या अंधारात वेश पालटून बाहेर पडत व शिवसेनेच्या फुटीर आमदारांना भेटून सौदेबाजी करीत. फडणवीस यांच्या या ‘हरुन अल रशीद’ प्रकरणाचा गौप्यस्फोट खुद्द सौ. अमृता फडणवीस यांनीच केला! व्यवहार, देणेघेणे वगैरे पक्के झाल्यावर फुटीचा दिवस ठरला. शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपने त्यांचे मिशन पूर्ण केले, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अखंडतेचा व स्वाभिमानाचा बळी दिला. शिवसेना फोडताच बाजूच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रात घुसले व त्यांनी सोलापूर, सांगलीतील अनेक गावांवर दावा सांगितला. शिवसेना फोडण्याचे मिशन पूर्ण होताच महाराष्ट्रातील अनेक बडे उद्योग व गुंतवणूक गुजरातमध्ये पळविण्यात आली व राज ठाकरेंसारखे नेते ‘दोन-चार उद्योग महाराष्ट्रातून गेले म्हणून काय बिघडले?’ अशी भाषा बोलू लागले. शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर झाल्याची ही सुरुवात आहे. त्यामुळे भाजपचे मिशन पूर्ण झाले, असे गिरीश महाजन म्हणतात ते खरेच आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांचे मिशन ठरवले म्हणून चाळीस जण ‘दाम’ लावून फुटले. क्रांतीची वगैरे भाषा झूठ आहे. शिवसेना फोडली याचा भाजपवाल्यांना इतका आनंद झाला की, राज्यपालांसह भाजपच्या अनेक तोंडपाटलांची मजल छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यापर्यंत गेली. हिंदवी स्वराज्यातच शिवरायांचा अपमान करू व तो पचवून ढेकर देऊ हेसुद्धा भाजपचे एक मिशन पूर्ण झाले. महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले व तेही मुख्यमंत्र्यांसमोर. श्री. महाजन हे ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा संदर्भ द्यायला विसरले. वास्तविक, सत्तांतराच्या या‘ऑपरेशन’ व ‘मिशन’मध्येया दोन्ही संस्थांचा सहभाग मोठा होता व त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय भाजपचे मिशन पूर्ण झाले नसते. कोणत्या आमदाराचे काय प्रकरण आहे व त्याच्या मागे कोणती यंत्रणा लावून त्याच्या गळय़ाभोवती फास आवळायचा हे या मिशनचे एक धोरण होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदारांची त्यामुळे कायमची झोप उडाली व त्यांना निद्रानाशाचा विकार जडला. महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या झोपेची चिंता आहे. ‘‘तुम्ही किमान चार ते पाच तास तरी झोपा, असे मी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगतो, पण ते ऐकत नाहीत,’’ असे महाजन सांगतात. मुख्यमंत्री झोपत नाहीत व ते अहोरात्र काम करतात, असे महाजन म्हणतात. ते अहोरात्र काय काय दिवे लावतात? डोळे सताड उघडे असतानाच महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातने पळवून नेली. तेव्हा राज्यातील मिंधे सरकार झोपलेलेच आहे याविषयी लोकांच्या मनात शंका नाही”.
भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. येथे अहोरात्र जागून काम करण्याचा प्रश्न येतोच कोठे? शिवसेनेच्या आमदारांना व पदाधिकाऱयांना तडीपारीच्या नोटिसा बजावणे, आमदारांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणे याच कामासाठी त्यांना जागे राहावे लागते. पुन्हा चाळीस आमदार व दिल्लीचे हिशेब वगैरे पाहावे लागतात. तोसुद्धा एका मिशनचाच भाग आहे. भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार?