मुंबई :- अत्यावश्यक गंभीर रुग्णांना तत्काळ रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस प्रकल्प सुरू केला. 108 कॉलवर नि:शुल्क येणाऱ्या या रुग्णाहिकेचा सर्वाधिक लाभ प्रसूतीच्या महिलांना होत आहे. गेल्या दहा वर्षांत या रुग्णवाहिकेने 15 लाख 7 हजार 342 महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचवले आहे. यापैकी 38 हजार 917 बाळांचा जन्म चक्क या रुग्णवाहिकेत झाला असल्याचे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या बीव्हीजी कंपनीने सांगितले.
वर्ष 2001 राज्य लोकसंख्या गृहीत धरल्यास 12 कोटी 55 लाख लोकसंख्येस 1506 रुग्णवाहिकेची गरज आहे. आजमितीस 36 जिल्ह्यांत 937 रुग्णवाहिका आहेत. आश्चर्य म्हणजे हा प्रकल्प प्रारंभ झाल्यापासून म्हणजे 2014 पासून एकही नवी रुग्णवाहिका घेतलेली नाही.
प्रकल्प प्रारंभ झाल्यानंतर आजपर्यंत 108 रुग्णवाहिकेने 85 लाख 83 हजार 76 रुग्णांना मदत केली आहे. पैकी 50 लाख 33 हजार 602 रुग्ण सर्वसाधारण वैद्यकीय उपचारार्थ नेले. त्यातील 3 हजार 886 रुग्णांना रुग्णवाहिकेत प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला.
15 लाख 7 हजार 342 महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचवले. त्यातील 38 हजार 917 महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरुप पार पडली. 4 लाख 94 हजार 65 अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली. विष पिलेल्या 2 लाख 4 हजार 622 रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले. 26 हजार 811 भाजलेल्या रुग्णांना तर हृदयविकाराचा झटका आलेल्या 49 हजार 331 रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यास सर्वधिक लाभ…
85 लाख रुग्णांपैकी 108 रुग्णवाहिकेचे सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यास झाला असून या जिल्ह्यात पुणे 9 टक्के तर मुंबईत 6 टक्के रग्णांना लाभ दिला. वाशिम, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात अल्प म्हणजे 1.3 टक्के रुग्णांना 108 ने सेवा दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
108 रुग्णसेवेचे लाभधारक…
वर्ष लाभधारक
2022 – 14,20,554
2021 – 12,22,840
2020 – 10,35,186
2019 – 9,17,185
2018 – 14,80,249
2017 – 7,98,251
हेल्पलाइनवर रोज 4 हजार फोन
108 हेल्पलाइनवर राज्यात दैनंदिन 4 हजार फोन येतात. पैकी 1100 कॉल तत्काळ मदतीचे असतात. शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 22 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते. कॉलला प्रतिसाद देण्याची टक्केवारी 96 टक्के आहे, असा दावा या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बीव्हीजी कंपनीचा आहे.