मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत बोलताना शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत, असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा
– राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार
– राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग मॅपींग करणार
– राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार
– पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा विकास करणार
– सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार
– शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार