मुंबई – केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित करण्यात आले असून सन 2019 साठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन करण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन केले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते.
तसेच प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने देशातील सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे. सातत्याने दुसऱ्यांदा प्रथम पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे देशातील पहिलेच प्राधिकरण ठरले आहे.
प्राधिकरणाने विविध क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य जलक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन व जलपुनर्भरण या क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत – मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रातील प्राधिकरणाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत.