देशातील अन्य राज्यांमध्ये सुरू : अवकाळीचा साखर उत्पादनावर परिणाम
पुणे – देशातील अन्य राज्यांमध्ये गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, महापूर, अतिवृष्टी आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा धुमाकूळ सुरू असल्याने यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. गळीत हंगामात देशात कर्नाटक आणि उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे.
कर्नाटकमधील 9 कारखान्यांनी आतापर्यंत 6.67 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यामधून सरासरी 9 टक्के उताऱ्याने 60 हजार टन नव्याने साखर उत्पादन केले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 13 कारखान्यांनी 1.88 लाख टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी 8 टक्के उताऱ्याने 15 हजार टन साखर उत्पादन झाले आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडुमधील 6 साखर कारखान्यांमध्ये 5.88 लाख टन ऊस गाळप झाले असून, सरासरी 8.50 टक्के उताऱ्याने साखरेच्या उत्पादनात 50 हजार टनाची भर घातली आहे.
सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असले, तरीदेखील महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची मदार पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांना महापूर आणि अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यामुळे या भागातील प्रमुख पीक असलेल्या उसाच्या वाढीवर थेट परिणाम झाला. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. हा अंदाज नेमका खरा ठरला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत पाऊस समाधानकारक असल्याने विशेषत: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळीच्या आगोदरपासूनच चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली. या मुसळधार पावसाचा फटका उसाबरोबरच भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या अन्य पिकांनादेखील बसला आहे.
उत्पादनात 30 टक्के घटचा अंदाज
गेल्यावर्षी देशभरात 331 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरातमधील काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे यंदाच्या साखर उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. देशभरात यंदा साखर उत्पादनात 30 टक्के घट येण्याची शक्यता असून, देशभरातील कारखान्यांचे उत्पादन 260 ते 265 लाख टन होईल, असा साखर लॉबीचा अंदाज आहे.