मुंबई – अनलाॅकच्या वेगवेगळ्या टप्यात जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढत होत आहे. त्याचबरोबर मुंबईतदेखील कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमान सेवा व रेल्वे सेवा बंद करण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची शक्यता आहे. तसा विचारही सुरू असल्याचे वृत्त इंडिया टुडे वृत्तवाहिनीने दिले आहे.
दिल्लीत कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 60 हजार कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मुंबईत देखील कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमानसेवा व रेल्वेसेवा बंद करण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारदेखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नोव्हेंबरच्या सुरूवातीला दिल्लीत कोरोनाचे 5 हजार रूग्ण आढळून आले होते. मात्र नंतर रूग्णसंख्या वाढत गेली. 11 नोव्हेंबरला 24 तासात तब्बल 8 हजार रूग्ण आढळून आले. त्याचबरोबर दिवाळीनंतर महाराष्ट्रात देखील रूग्णसंख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात 2 ते 3 हजार दरम्यान रूग्ण आढळून येत होते.
मागील दोन तीन दिवसात रूग्णसंख्येने उसळी घेतली असून 18 नोव्हेबर रोजी राज्यात 5 हजार रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर काल (19 नोव्हेंबर) एका दिवसात राज्यात 5 हजार 535 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.