मुंबई – दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान घेतली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षांचा निकाल जुलैच्या अखेरीस तर बारावीच्या परीक्षांचा निकाल हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात करोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला होता. मात्र, अखेर आज वर्षा गायकवाड यांनी परीक्षांचा कालावधी जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
करोनाचा काळ लक्षात घेता यंदाच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे कठीण असल्याचं मत शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागण्याची शक्यता आहे.