पुणे -केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवारी (दि.12) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच या
सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे तसेच देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे यासाठी होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षण संचालक,
उपसंचालक, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य व अधिकारी यांची ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये सर्वेक्षणाबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
एम. डी. सिंह यांनी राज्यात होणारे सर्वेक्षण आणि त्याअनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. राज्य शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग
सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. या सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग 12 नोव्हेंबर रोजी सुरू ठेवावे लागणार आहेत.
अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राचार्य यांच्याशी सर्वेक्षणाच्या तयारीबाबत संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येता यावे यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.