पुणे(प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत 31 मेपर्यंत वाढवली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरनाचे (महारेरा) कामकाज पुढील दोन आठवडे बंद राहणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यापासून जगभरामध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. देशातही सुरुवातीला 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला. त्यानंतर 17 मेपर्यंत, त्यानंतर आता 31 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. याच धर्तीवर कार्यालयात होणारी गर्दी टाळून करोनाचा प्रादुर्भाव रोखणयासाठी महारेराचे पुढील दोन आठवडे कामकाज बंद करण्यात आले आहे.
मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाईन सुरू राहणार आहेत. दरम्यान 31 मे ला लॉकडाऊन संपल्यानंतर 1 जून रोजी महारेराच्या कामकाज बाबत शासनाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याविषयी रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. निलेश बोराटे म्हणाले, बंद कालावधीतही फक्त तातडींची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. प्रकरण किती तातडीचे आहे, या बाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या पूर्ण खंडपीठाकडून घेतला जाईल. तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी अर्ज महारेरा सचिवांकडे त्याच्या ईमेल आयडीवर सादर करता येईल.