नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने तिसरा पुरस्कार पटकावला आहे. देशातले सगळ्यांत स्वच्छ राज्य म्हणून मध्य प्रदेश पहिल्या तर छत्तीसगढ दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, स्वच्छ शहराचा किताब मध्य प्रदेशातील इंदोर शहराने लागोपाठ सहाव्यांदा पटकावला आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत गुजरातमधील सूरत दुसरे तर राज्याची राजधानी मुंबई शहर तिसरे ठरले आहे. गेल्या वर्षी विजयवाडा शहर तिसऱ्या स्थानावर होते. यंदा हे स्थान मुंबईने पटकावले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते.
पाचगणी पहिले
1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील पाचगणी शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर छत्तीसगढमधील पाटण दुसऱ्या तर राज्यातील कराड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांत हरिद्वार प्रथम, वाराणसी दुसरे तर ऋषिकेश शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. याच सर्वेक्षणात राज्यातील देवळालीला देशातील सगळ्यात स्वच्छ छावणी बोर्डाचा पहिला क्रमांक देण्यात आला आहे.