वीसगाव खोरे (वार्ताहर) – भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील कळकवाडी, शेरताटी, धनावडेवाडी, वरवडी डायमुख, नेरे, पाले, पाटणे वाडी, वरवडी बुद्रुक, पांडवाडा, राजवाडा, आंबाडे, बालवडी, गोकवडी, पळसोशी, बाजारवाडी,नीळकंठ, उत्रौली, कान्हवडी, खानापूर, भाबवडी, धावडी या परिसरात बुधवारी (दि. 21, रात्रभर मुसळधार पाऊस पडत
होता. या पावसाने भात खाचराचे, भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
वीसगाव खोऱ्यात पावसाने झोडपल्यामुळे कोळेवाडी येथील आंबाडे-कोळेवाडी रस्ता वाहून गेला आहे. कळकवाडी येथील अनेक शेतकऱ्यांची भात खाचरे, दोन छोटे बंधारे वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांनी नुकतीच भातलावणी केली होती. ती वाहून गेले आहे. शेतातील घेवडा, पावटा, भुईमूग, कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी वीसगाव खोऱ्यातील शेतकरी करीत आहेत.
गेल्या आठवड्यापासून पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे भात लावणी सुरू केली होती. काल संध्याकाळी भातलावणी उरकली. मात्र, सकाळी जाऊन पाहतो तर संपूर्ण भात खाचर वाहून गेले आहे. सरकारने पंचनामा करून तातडीची मदत करावी.
– बाबूराव तुपे, प्रगतशील शेतकरी, वरवडी बुद्रुक, ता. भोर