Maharashtra Rain Update : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाले असून १३ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा प्रभाव कमी होत असून उकाडा वाढल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. त्यामुळे राज्यातील सर्वच भागांतील किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानवाढ तुलनेने अधिक जाणवत आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
१३ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक भागांत सकाळपासून ढगाळ हवामान होते. आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे, नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यांत आज सकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी
राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे थंडी मोठ्या प्रमाणात ओसरली आहे. सकाळी आणि रात्री जाणवणारी गारठा कमी झाला असून वातावरण दमट बनले आहे. याचा परिणाम विशेषतः शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे.
पुढील दोन दिवसांचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमीच राहणार असून, तापमानात काही ठिकाणी चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गानेही खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
आजपासून राज्यात हाडं गोठवणारी थंडी; हवामान विभागाकडून अलर्ट जारी






