Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडवली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः महाराष्ट्र मधील नांदेड, अहिल्यानगर, परभणी, जालना आणि नाशिक जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला. (Maharashtra Rain Update) नांदेडमध्ये वादळी पावसाने बारड परिसर झोडपला नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. दिवसभराच्या उकाड्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बाजारपेठेतील व्यवहार विस्कळीत झाले. अहिल्यानगरमध्ये फळबागांना फटका अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागली. वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. (Maharashtra Rain Update) परभणीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस परभणी जिल्ह्यात दिवसभर तीव्र उकाड्यानंतर सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. शहरासह अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. धुळीचे लोट, उडणारा कचरा आणि रस्त्यांवर साचलेले पाणी यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. (Maharashtra Rain Update) जालन्यातील घनसावंगी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. दिवसभराच्या कडक उन्हानंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेकांची धावपळ उडाली. (Maharashtra Rain Update) नाशिकमध्ये केळीबाग उद्ध्वस्त, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बोकटे शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. शेतकरी बापूसाहेब दाभाडे यांची दोन एकर केळीबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. मोठी आर्थिक गुंतवणूक करून उभारलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून अनेक घडांचे नुकसान झाले आहे. कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने पर्याय म्हणून केलेली केळी लागवडही निसर्गाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. (Maharashtra Rain Update)