मुंबई – शिवसेनेचे (शिंदे गट) मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. पण त्यांच्या या वक्तव्यावरून आता “यू-टर्न’ घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून सापत्न वागणूक मिळते, असे मी बोललोच नाही. तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला, असे आता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण अगदी चार दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर कीर्तिकरांनी अचानक घुमजाव का केला? कीर्तिकरांना नेमकी कोणाची भिती आहे? यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.
गजानन किर्तीकर म्हणाले, मी जेव्हा खासदार होतो अडीच वर्षे तेव्हा त्या अडीच वर्षात भाजपा आणि शिवसेनेची युती संपली आणि महाविकास आघाडी सुरु झाली. तेव्हा त्या अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही एनडीएचे घटक पक्ष नव्हतो. एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर आमची आणि भाजपची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपसह गेलो. त्यामुळे आम्ही आता एनडीएचे घटक आहोत हे केंद्रीय मंत्र्यांना कळले की नाही? की आम्हाला ते अजून पूर्वीप्रमाणेच समजतात? इतकंच मला म्हणायचे होते, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये नक्कीच आलबेल नसल्याचे सांगण्यात येत होते. पण असे काहीही नसल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. पण आता स्वतः केलेले वक्तव्य मी केलेले नाही, असे कीर्तिकर यांनी सांगितल्याने कीर्तिकरांवर नेमका कोणाचा दबाव आहे का? असे विचारण्यात येत आहे.