औरंगाबाद – शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली असली तरी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या मधील वाद काही संपलेला दिसत नाही. काल सत्तार यांनी माझ्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती नको, तर मैत्रीपूर्ण लढत असावी असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना मैत्रीपूर्ण कसली, कुस्ती हवी, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे नगारे वाजण्याआधीच शिंदे गट-भाजप यांच्यात वाद सुरू झाल्याचे दिसून येते.
माझ्या मतदारसंघात भाजप नकोच अशी भूमिका घेत मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी असे अब्दुल सत्तार यांनी थेटपणे बोलून दाखवले. एवढेच नाही तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी भूमिका घ्यावी, असेही सत्तार म्हणाले.
एकीकडे शिंदे गटावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाला भाजपचे नेते ढाल बनून उत्तर देत आहे. मात्र दुसरीकडे त्याच शिंदे गटातील सत्तार मात्र निवडणुकीत भाजपला सोडून मैदान मारण्याची भाषा करतात. यामुळे शिवसेना भाजपा युती स्थानिक स्वराज्य संस्थांत पाहायला मिळणार की मैत्रीपूर्ण लढत हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सत्तारांना भाजपचा विरोध! –
मंत्रिमंडळाच्या विस्तारात अब्दुल सत्तारांना भाजपचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना संधी दिली. त्यातच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापूर्वीच सत्तार यांनी माध्यमांमध्ये जाहीर करून टाकला. त्यावेळीसुद्धा फडणवीसांनी सत्तार यांचे कान टोचले होते. यामुळे भाजप आणि सत्तार हे गणित काही जुळताना दिसून येत नाही.