मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी केली गेली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे छत्रपतीच्या अपमानाच्या मुद्द्यावरून शिंदे-भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
लोढा यांच्या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्र्यांला तरी किमान शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. त्यांनी बेइमान व्यक्तीची तुलना शिवाजी महाराजांशी केली, अशी टीका राऊतांनी केली.
राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली. यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे, यात काहीही दुमत नाही. पण एकनाथ शिंदे हे बेइमान व्यक्ती नाहीत. “शिवाजी महाराजांनीदेखील वेळप्रसंगी गनिमी कावा’ केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीदेखील वापरला आहे, असे गायकवाड म्हणाले.
तसेच महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे जे काही दौरे करता आहेत त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. जे काही ते दौरे करत आहेत इतिहासात पहिल्यांदा पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. मतदानातून जनता दाखवून देईल ते कुणा सोबत आहेत. हे सरकार शिवरायांच्या आदर्शावर चालणारे आहे. ज्यांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही असेच लोक असे वक्तव्य करतात आणि नंतर माफी ही मागतात, अशी विधान त्या लोकांनी करू नयेत, असेही गायकवाड म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी अलीकडेच शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असे म्हटले. यावरून महाराष्ट्रातील राजकारण बरंच तापले आहे. हे प्रकरण ताजं असताना भाजप नेते आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी केली होती.