नवी दिल्ली – भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले आहे. पण त्यांचा ठावठिकाणा अजून महाराष्ट्र पोलिसांना मिळालेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून त्या गायब असल्याचे वृत्त आहे.
नुपूर शर्मांच्या विरोधात त्यांनी प्रेषित महंमद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रझा अकादमीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार तेथील पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगाने त्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्राचे पोलिस दिल्लीत गेले आहेत. तेथे त्यांनी नुपूर यांच्या घरी चौकशी केली असता त्या तेथे नसल्याचे त्यांना समजले.
दरम्यान या पार्श्वभूमीवर नुपूर शर्मा यांनी आपल्या वकिलांमार्फत ठाणे पोलिसांना एक ईमेल पाठवला असून त्यात त्यांनी पोलिसांपुढे हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत असे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.