373 प्रकल्पांत 1 कोटी वर्ग मीटर हरित बांधकाम : हरित इमारत क्षेत्रात भारत जगात अव्वल
पुणे – हरित इमारत निर्मितीत महाराष्ट्राने सरलेल्या वर्षात देशांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात 373 इमारतींमध्ये 1 कोटी 2 लाख वर्ग मीटर एवढे हरित बांधकाम झाले आहे.
“जीबीसीआय’ इंडिया म्हणजे ग्रीन बिझनेस सर्टिफिकेट इंकने लीड म्हणजे लीडरशिप इन एनर्जी ऍन्ड एन्व्हायरमेंटल डिझाइनमधील भारतातील 10 पहिल्या क्रमांकाच्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. लीड प्रमाणित क्षेत्रफळाच्या आधारावर हे मूल्यांकन केले जाते. गेल्या 3 वर्षांपासून ही मूल्यांकन करण्याची पद्धती सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हरित इमारतींच्या निर्मितीमध्ये भारत अग्रस्थानावर आहे. केवळ भारत सरकारच नाही तर, राज्य आणि भारतातील विकासकही हरित इमारती निर्माण करण्यामध्ये पुढाकार घेत आहेत. यासाठी नागरिकही संवेदनशीलता दाखवीत आहेत. यामुळे केवळ आर्थिक विकास होत नाही तर, त्याचबरोबर हा विकास शाश्वत पद्धतीने होतो.
नागरिकांच्या जगण्याचा दर्जा वाढतो, असे “जीबीसीआय’चे अध्यक्ष महेश रामानुजम यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर अशी मोहीम सुरू होण्याची गरज आहे. विकसित देशांनी यामध्ये पुढाकार घेण्याची अपेक्षा असताना भारताने पुढाकार घेतला आहे व भारत यात यशस्वी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बंगळुरू येथे पुढील महिन्यांमध्ये ग्रीन बिल्ड इंडिया परिषद होणार आहे. यावेळी जगभरातील हरित बांधकामातील तज्ज्ञ या विषयाची उपयोगिता आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत
लीड प्रमाणित इमारतीमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते. इमारतीत नैसर्गिक स्त्रोतांचा कमाल वापर केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही चांगले राहते, असे समजले जाते. गेल्यावर्षी हरियाणाने चांगली कामगिरी करून तिसऱ्या स्थानावरील तमिळनाडूला मागे ढकलून तिसरे स्थान पटकावले आहे. आता भारतामधील लीड प्रमाणित इमारतीमधील क्षेत्रफळ 4 कोटी 83 लाख मीटरचे झाले आहे, यामध्ये 8 कोटी 43 लाख लोक राहतात. भारतामध्ये सध्या 1400 लीड प्रमाणित इमारती आहेत. त्यामध्ये शाळा, हॉस्पिटल, कार्यालये, निवासी इमारतींचा समावेश आहे. या इमारती बांधकामाच्या अगोदर हरित तंत्रज्ञानाचा विचार करून तयार केल्या जातात. त्यामुळे या इमारती कार्यरत असेपर्यंत त्या हरित दंडाची पूर्तता करतात.