मुंबई – भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे पहिल्या नंबरचे राज्य ठरले आहे. “आयआयएफएल’ हुरून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ही माहिती समोर आली आहे. 2022मध्ये महाराष्ट्रातील श्रीमंतांचा आकडा 335वर पोहोचला आहे.
2021च्या तुलनेत राज्यातील श्रीमंतांच्या आकड्यात 33 जणांची वाढ झाली आहे. हुरून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीतील सर्वात तरुण 19 वर्षीय कैवल्य वोहरा ठरला आहे. कैवल्य वोहराने “झेप्टो’ची स्थापना केली.
10 वर्षांपूर्वी यादीतील सर्वात तरुण 37 वर्षांचा होता. त्यानंतर आज जाहीर झालेल्या यादीत 19 वर्षांचा आहे. सॉफ्टवेअर कंपनी कॉंन्फ्ल्यूअंटच्या सह-संस्थापक, नेहा नारखेडे (37) तरुण महिला स्वयंनिर्मित उद्योजक आहेत.
महाराष्ट्रानंतर दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात. दिल्लीत 185, तर कर्नाटकात 94 श्रीमंत आहेत. याशिवाय, सर्वाधिक श्रीमंत असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याने टॉप-10मध्ये स्थान पटकावले असून 8व्या क्रमांकावर आहे. पुण्यात 34 श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा 3 जणांची यादीत भर पडली आहे. सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
देशातील शहरांचा विचार करायचा झाल्यासही अतिश्रीमंतांची मुंबईला पहिली पसंती आहे. एकट्या मुंबईत 283 श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा यात 28 जणांची वाढ झाली. 2018 मध्ये हाच आकडा 233 होता. मुंबईनंतर या यादीत नवी दिल्ली आणि बंगळुरूचा क्रमांक येतो. दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे 185 आणि 89 श्रीमंत राहतात. मुकेश अंबानी मुंबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.